Saturday, July 27, 2024

ऑक्सिजन वाहिनी बनलेल्या कॅनॉल रोडवर उद्या पुन्हा स्वच्छतेचा जागर; दुर्गंधी दूर करण्यासाठी नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – शहर व वाडी (बु) परिसरातील कॅनॉल रोड हा नागरिकांसाठी ऑक्सिजन वाहिनी बनला आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या रोडवर बाजार भरत असल्याने व काही नागरीक रस्त्यावर कचरा टाकत असल्यामुळे या ऑक्सिजन रोडवर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. दुभाजकामध्ये काटेरी झुडपेही खूप वाढली आहेत.

ही समस्या लक्षात घेऊन माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व वाडी भागातील नागरिकांच्या सहकार्याने युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी स्वछता अभियान राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पावडे यांनी नागरिकांच्या श्रमदानातून हा रस्ता दुर्गंधीमुक्त करून सुशोभित करण्याचा विडा उचलला आहे.

या रोडवर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक साठी हजारो लोक येत असतात. रोड लगतच्या खुल्या जागेत योगा, क्रिकेट, व्हॉलीबॉल सारखे खेळ आपापल्या ग्रुपने खेळल्या जातात. सदरील कॅनॉल रोड वर नृसिंह चौक, निळा रोड ते रेल्वे डिव्हिजनपर्यंत अशा पाच किलोमीटर अंतरात लोकसहभागातून राबविलेल्या ‘एक झाड माझे अभियान’ अंतर्गत एक हजार पेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली व मागील दोन वर्षांपासून संगोपनही करण्यात आले. ही झाडे आता चांगली बहरली आहेत. परंतु वाढलेली काटेरी झाडे-झुडपे, कचरा यामुळे या रस्त्यावरील दुर्गंधी खूप वाढली आहे. याचा या भागातील नागरिकांना व मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांनाही खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

ही समस्या लक्षात घेऊन विठ्ठल पावडे यांनी पुढाकार घेत स्वछता अभियानास स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सुरुवात केली आहे. या अगोदरही तीन वर्षांपूर्वी पावडेंनी स्वछता मोहिम राबवली होती, पण पुन्हा येथे जैसे थे स्थिती झाली. त्यामुळे आता पुन्हा स्वच्छतेचा जागर केला जात आहे. या अभियानात प्रा. परमेश्वर पोळ, शिवाजीराव पाटील, रुपेश लांडगे, साहेबराव पावडे, मिलिंद देशमुख, रमेशराव पावडे, कुंडलीकराव पावडे, सिद्धेश्वर कानवटे, घुगे, डी. डी. फुले, संदीप मस्के, वाठोरे आदी पर्यावरणप्रेमी , सामाजिक बांधिलकी असलेले आधिकारी, पत्रकार,  सामाजिक संस्था, वृक्षमित्र, निसर्गप्रेमी, लोकप्रतिनिधी , सामाजिक कर्याकर्ते,  शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पाेलीस कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी आदींनी आपला सहभाग नोंदवला. हे अभियान रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत नृसिंह चौक निळा रोड ते वामन नगर पर्यंत राबविण्यात येत आहे.

*उद्याचे २ तास स्वच्छतेसाठी*

मागील ५ दिवसापासून नृसिंह चौक ते वामन नगर पर्यंत स्वच्छता अभियान चालू आहे. उद्या रविवारी सकाळी ७ ते १० या वेळेत पाण्याची टाकी, लोकमित्र नगर, कॅनॉलरोड दरम्यान महाश्रमदान करण्यात येणार असून यात नागरिकांनी योगदान देवून पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!