ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
लोहा (जि. नांदेड)- कंधार तालुक्यातील नारनाळी येथून सोमवार दि. २८ मार्च रोजी अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाचे प्रेत धर्माबाद तालुक्यातील येल्लापूरच्या शिवारात पोत्यात आढळून आले. बालकाचे अपहरण करून खून करण्यात आल्याच्या या धक्कादायक घटनेने कंधार तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कंधार तालुक्यातील नारनाळी येथील रेखा माधव देव्हारे (वय २८) या त्यांच्या घरी काम करीत होत्या. तेव्हा त्यांचा छोटा मुलगा अभिषेक माधव देव्हारे (वय ४) हा सायंकाळी सहाच्या सुमारास जवळच असणाऱ्या किराणा दुकानातून बिस्कीट घेवून येतो म्हणून गेला. मात्र तो परतलाच नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो सापडला नाही.
त्यानंतर अभिषेकला कुणीतरी पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई रेखाबाई यांनी कंधार पोलीस स्टेशनमध्ये दिली. या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अपहरण झालेल्या अभिषेकचा मृतदेह धर्माबाद तालुक्यातील येल्लापूरच्या शिवारात गोदावरी नदीच्या कडेला पांढऱ्या रंगाच्या पोत्यात दिसून आला.
ही माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, देगलूरचे उपविभागीय अधिकारी सांगळे, धर्माबादचे उपविभागीय अधिकारी गायकवाड, कंधारचे उपविभागीय अधिकारी मारोती थोरात, कंधारचे पोलीस निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी येल्लापूर येथे धाव घेत तेथे जाऊन पाहणी केली. मयत अभिषेकच्या मृतदेहाचे धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. कंधार पोलिसांत सुरुवातीस दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात आता अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२ च्या गुन्ह्याची वाढ करण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कंधारचे पो.नि. पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. इंद्राळे करीत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)