ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
![](https://godateer.com/wp-content/uploads/2023/02/Polish_20230205_223344156-compressed.jpg)
नांदेड- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज त्यांच्या बीआरएस पक्षाची जाहीर सभा नांदेडमध्ये घेत महाराष्ट्रात राजकीय एन्ट्री केली. नांदेडमध्ये भारत राष्ट्र समितीच्यावतीने सचखंड गुरुद्वारा बोर्ड मैदान, हिंगोली गेट येथे पक्षाच्यावतीने पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर सभेचे आयोजन आज रविवार, दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात आले होते.यावेळी अनेक माजी आमदारांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला.
![](https://godateer.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230205_222825-compressed.jpg)
या कार्यक्रमांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील माजी आमदार दीपक आत्राम, ठाणे जिल्ह्यातील माजी आमदार दिगंबर भिसे, लातूर जिल्ह्यातील उदगीरचे माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी, यवतमाळ जिल्ह्यातील माजी आमदार राजेंद्र तोडसाम, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, शिवसेनेचे प्रवीण जेठेवाड, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ज्ञानेश्वर वाकुडकर, संतोष हंबर्डे, राजकुमार जाधव, ऍडव्होकेट साहेबराव चव्हाण, शंकर पाटील, उमेश पाटील, गोपाल शेठ गोरंट्याल, जयश्री जंगम, अनिता आत्राम, भीमराव काळदाते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
दरम्यान, भारत राष्ट्र समिती पक्षाचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये होणारी सभा उधळून लावण्याचा गंभीर इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी दिला होता. मात्र पोलिसांनी जहागीरदार यांच्यासह मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांना सभेपूर्वी ताब्यात घेतले.
अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या बाभळी बंधाऱ्यातील महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी तेलंगणा सरकारने हिरावून घेतल्याने त्या भागातील शेकडो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केल्याच्या निषेधार्थ इशारा दिल्या गेल्याने शेकडो मनसे पदाधिकारी आक्रमक होऊन सभेच्या दिशेने जात असल्याच्या तयारीत असताना त्यांना स्थानिक पोलीस अधिकारी यांनी अटक केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बालाजी मंदिर परिसरातील मध्यवर्ती कार्यालयातून सभेच्या दिशेने जात असताना वजिराबाद पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी- कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. यात माँटीसिंग जहागीरदार, अब्दुल शफीक, संतोष सुनेवाड, दीपक स्वामी, उषा नरवाडे, शक्तिसिंह परमार, पवन पवार, साईनाथ जाटलावार, शुभम पाटील, योगेश्वर मोरे, दिलीप राठोड, पप्पू मनसुके, आकाश गटेंवाड, अमर कोंडराज, अंकित तेहरा, सागर ठाकुर, गणेश जोरगेवार, विशाल पावडे, हेमंत पांचाळ, राम जाधव, माधव ककांळ, कल्पना देशमुख, जयश्री पाटील, प्रेमाला हणमंते, संध्या पंचभाई, वैशाली चक्रावार, जनेंद्र केंद्रे, सय्यद फारूक, सागर चौहान, आशिष परदेशी, शंकर सरोदे, अविनाश वैष्णव, निशांत तरेवार, रामेश्वर कटकमोड़वाड, संघरत्न जाधव, सतीश वाघमारे, भास्कर गच्चे, ओंकार सावळे, गजानन चव्हाण, हर्ष रोकडे, गोविंद मोरे अशा अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.
दरम्यान, बीआरएसच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, देशांमध्ये आपली स्वतःची नैसर्गिक संपत्ती असताना देश आज रसातळाला गेला आहे. देशातील शेतकऱ्यांना व नागरिकांना वीज, पाणी, आरोग्य महागाई आदी गंभीर प्रश्नांना सामना करावा लागत आहे. मोदी सरकारमुळे ही देशावर पाळी आली आहे. देशातील जनतेने काँग्रेस व भाजपा सरकारच्या विरोधात वज्रमुठ जर नाही बांधली तर देश अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. बीजेपीचे आणि काँग्रेसचे धोरण धर्म, रंगीबेरंगी झेंडे, जाती-जातीतील राजकारणात वाद निर्माण करणे आहे. मात्र त्यांच्या नितीला देशातील जनतेने ओळखले पाहिजे. जागृत होणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात तेलंगणा पॅटर्न महाराष्ट्र सहसंबंध देशभर राबविणार असून “आपकी बार किसान सरकार” अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा बीआरएस पक्षाचे प्रमुख के चंद्रशेखर राव यांनी यावेळी नांदेडमध्ये बोलताना व्यक्त केली.
सभेला संबोधित करताना के सी आर पुढे म्हणाले की, देशात जुमलेबाज मोदींचे सरकार असल्याने सर्व क्षेत्र हे खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. धर्मा धर्मामध्ये, रंगीबेरंगी झेंड्यामध्ये, जाती-जातीत येथील राजकीय पार्ट्या संबंध मतदारांचा बटवारा करत आहेत. देशांमध्ये नैसर्गिक साधनसामग्री भरपूर असताना त्या साधनसामुग्रीचा योग्य विनियोग केंद्र सरकारला व राज्य सरकारला करता येत नाही असा आरोप करत देशातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतेची बाब आहे. शेतकऱ्याला पाणी, वीज हे सरकार पुरवू शकत नाही. देशात काही भागात ओला दुष्काळ तर काही भागात कोरडा दुष्काळ पडतो. पावसाळ्यात पडलेले पाणी हे मोठ्या प्रमाणात समुद्राला जाऊन मिळते. परंतु देशात कुठल्याच राज्यामध्ये साठवण क्षमता करणारे डॅम नाहीत. परंतु तेलंगणामध्ये बी आर एस पार्टीच्या वतीने प्रत्येक शेतात मोफत पाणी, मोफत वीज आणि तीही 24 तास असल्याचे त्यांनी सांगितले. देशामधून सध्या बी आर एस पार्टीला समर्थन मिळत आहे. येणाऱ्या काळात बी आर एस पार्टी ताकदीने संबंध देशभरात आपल्या पक्षाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. तेलंगणासारखे छोटे राज्य जर शेतकऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना, दलित, आदिवासींना न्याय देत असेल तर अन्य देशात अन्य राज्य का देऊ शकत नाहीत? कारण या ठिकाणच्या राजकीय लोकांची इच्छाशक्ती नाही. गेली 75 वर्षे देशाला आजादी मिळून झाली तरीही देशांमध्ये पिण्याचे मुबलक पाणी नाही. शेताला पाणी नाही, वीज नाही अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते, रेल्वे लाईन तर सोडाच आत्महत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अन्नदाता जर देश हितासाठी अन्न उगवत असेल आणि त्याची जर आत्महत्या होत असेल तर ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये प्रेत उगवत आहेत असा सनसनीत आरोप के सी आर यांनी केला. येणाऱ्या काळात आपकी बार किसान सरकार आल्याशिवाय विकास होणार नाही. भारत बुद्धीजींचा देश आहे बुद्धु चा नाही असे सांगत जयप्रकाश नारायण यांनी एका शब्दात देश एक केला होता तीच परिस्थिती आता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत नांगर चालविले परंतु आता कलम पेन आणि कायद्याचे वाचन करणे आवश्यक आहे. देशामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मुबलक कोळसा उपलब्ध असून वीज येथे मिळत नाही. भारताकडे भरपूर नैसर्गिक संपत्ती आहे, परंतु येथील जनता अनेक सुविधांपासून वंचित आहे. पाणी, भूमी आणि कोळसा भरपूर प्रमाणात असतानाही सरकारचे नियोजन चुकीचे असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रामधून कृष्णा, गोदावरी, प्रवरा, वैनगंगा पैनगंगा दी नद्या वाहतात. परंतु या नद्यांचे पाणी आपसामध्ये देण्याघेण्यावरून हे सरकार वाद घालत आहेत. देशाला बरबाद करण्याचे काम काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने केलेले आहे. मेक इन इंडिया पंतप्रधानांचे स्वप्न हे जोक इन इंडिया झाले आहे. भारताला आता चेहरा बदलण्याची गरज आहे. संबंध भारतभर पतंगाचा मांजा, दिवाळीचे दिवे, गणेश मूर्ती यासह आदी वस्तू चायना देशातून मागविण्यात येतात यामुळे संबंध भारत देश चायना बाजार झाल्यासारखे वाटते. पावसाचे पडलेले पाणी साठवण क्षमता नसल्याने पन्नास हजार टीएमसी पाणी समुद्रात जाऊन मिळते. मन की बात किती दिवस ऐकायची हे कुठेतरी आता थांबले पाहिजे. देश प्रगतीपथावर न्यायचा असेल तर प्रदेशातील काही देशाचे आपल्याला मार्गक्रमण करावे लागणार आहे. त्यांचा आदर्श घ्यावा लागणार आहे. तेलंगणामध्ये 24 तास शेतकऱ्यांना व नागरिकांना वीज मोफत आहे. कुठलाही एमएससीबीचा इंजिनियर कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन धमकावत नाही. शेतकऱ्यांचा विमा आम्ही मोफत काढतो. तेलंगणातील शेतकऱ्याचा मृत्यू कसाही असो नैसर्गिक असो, अपघाती आठ दिवसात त्याच्या घरी पाच लाखाचा चेक जातो. हीच स्थिती शेताबद्दल आहे. दहा हजार रुपये पर एकरी शेतकऱ्यांना दरमहा दरवर्षी आम्ही देत असतो. शेतकऱ्याचे उत्पादन सरकारी खरेदी केंद्रावरच केल्या जाते. सगळं काही तेलंगणात होते तर मग महाराष्ट्रात, देशात का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
देशात कोळसा असून वीज मिळत नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून गोदावरी नदी वाहते व कोळसाही महाराष्ट्रात आहे परंतु येथील जनतेला वीज आणि पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. येणाऱ्या काळात गुलाबी सरकार बनवण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी दोन वर्षात संबंध देश विजेने चमकणार असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रामध्ये धनाची कमी नाही पण इथं काम करणाऱ्या राजकीय नेत्यांची मानसिकता बरोबर नाही असाही आरोप त्यांनी केला. पीक विम्याच्या नावाखाली झुटे वादे संबंध नागरिकांना झुलवत ठेवणे. प्रचंड महागाई, पेट्रोल, डिझेलची वाढ, खाजगीकरणाकडे वाटचाल. यामुळे देश रसातळाला गेला आहे. तब्बल एक तास दहा मिनिटात के सी आर यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)