Saturday, July 27, 2024

नांदेडमध्ये वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून ७१ लाख २८ हजार रुपयांची वसूली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतूक शाखा सतत प्रयत्न करते. परंतु काही वाहनधारक मनमानी करत वाहतूक नियमांची पायमल्ली करतात. एवढेच नाही तर अनेकवेळा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालतात. आता वाहतूक शाखेकडे इ- चलनची सोय असल्याने वाहनधारकांवर दंड जरी झाला तरी आपण पुढे भरू असा समज करून वाहतूक नियमांचा भंग करण्यात येत आहे. अशा वाहनावर दंडात्मक कारवाईनंतर वसुलीसाठी न्यायालयाने आता लक्ष घातले आहे. नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात ८३ हजार ८०७ वाहनधारकांकडून १९ हजार ३०३ चलनाद्वारे ७१ लाख २८ हजार सहाशे पन्नास रुपयांची वसुली वाहतूक शाखेत जमा झाली. यासाठी न्यायालयाची महत्त्वाची भूमिका ठरली आहे.

नांदेड शहरातील रस्त्यांची रुंदी लक्षात घेता वाहनांची वाढती संख्या व विनापरवाना चालणारी वाहने यामुळे नेहमी वाहतुकीची कोंडी पाहावयास मिळते. शहरात महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेले सिग्नल व त्याचे नियमन वाहनधारकांकडून केल्या जात नाही. एकवेळा एकेरी वाहतूक मार्गातून अनेक वाहने सुसाट वेगाने जातात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपघातही होत असतात. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे आपल्या सहकार्‍यांच्या बळावर नेमून दिलेल्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. परंतु वाहनधारक या नियमांची पायमल्ली करण्यात धन्यता मानतात. मात्र आता अशा वाहनधारकांविरुद्ध इ- चलनाद्वारे कारवाई केल्या जात आहे. कर्तव्यावरील पोलीसांनी त्या वाहनाचा फोटो काढताच संबंधित वाहनधारकांना त्याच्या गाडीवर लावलेला दंड याची माहिती मिळते. परंतु हा दंड लगेच भरल्या जात नाही.

कोट्यावधी रुपये दंडाची रक्कम वाहनावरती आहे. परंतु हा दंड वसूल करण्यासाठी न्यायालयाने पुढाकार घेतला. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत आणेकर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश राजेंद्र रोटे यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय लोक अदालततीमधून 71 लाख 28 हजार सहाशे पन्नास रुपयांचा दंड वाहतूक शाखेकडे जमा करण्यासाठी प्रवृत्त केले.

विना लायसन्स वाहन चालवणे, पोलिसांच्या इशाऱ्याकडे लक्ष न देणे, विमा नसणे, एकेरी वाहतुकीत घुसणे, झेब्रा क्रॉसिंग तोडणे, सिग्नलचे नियम न पाळणे, ट्रिपल सीट, ऑटोमध्ये फ्रंट सीटवर सवारी वाहने, ड्रेस कोड नसणे, पोलिसांशी हुज्जत घालणे, ग्रामीण परवाना असताना शहरात वाहन चालविणे यासह आदी वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना हा दंड लावण्यात आलेला होता. येत्या काळातही दंड वसूल करण्यात येणार असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी सांगितले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!