Saturday, July 27, 2024

नांदेडला पोलीस आयुक्तालय होणार, लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव -गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती; गृहमंत्र्यांनी संजय बियाणी कुटुंबियांची घरी जाऊन घेतली भेट

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मराठवाड्यात औरंगाबादनंतर आता नांदेडला पोलीस आयुक्तालय होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेडला पोलीस आयुक्तालय स्थापण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रीमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान नांदेडमध्ये येताच गृहमंत्र्यांनी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले बिल्डर संजय बियाणी यांच्या कुटुंबियांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

याबाबत बोलताना वळसे पाटील म्हणाले की, नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज नांदेड परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज घडीला 36 पोलीस स्टेशन आहेत तर महानगरामध्ये 12-14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरातील पोलीस स्टेशनची संख्या लक्षात घेऊन नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.


नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांची आढावा बैठक त्यांनी घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृहविभागाच्या बैठकीत घेतला. अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. यावेळी परिक्षेत्रीय पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, लातूरचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, परभणीचे जयंत मीना, हिंगोलीचे एम. राकेश कलासागर यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय बियाणी कुटुंबियांची भेट
मी संजय बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. आरोपीविरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचीही यावेळी उपस्थिती होती. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हे अचूक झाले पाहिजे. याचबरोबर याचे प्रमाणही अधिक वाढले पाहिजे, असे निर्देश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सचखंड गुरुद्वारा येथे जाऊन दर्शनही घेतले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!