ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)
राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्था गुवाहाटी येथे कार्यशाळा संपन्न
नेतृत्व करण्याचे पाशा पटेल यांना साकडे
![](https://godateer.com/wp-content/uploads/2021/12/pasha-patel_201910312014.jpg)
आसामसह ईशान्य भारतात बांबू हा ब्लर मध्येच आहे. बांबूचे महत्व काळाच्या ओघात या भागातील लोक विसरत गेले आहेत. बांबूचे सामाजिक, पर्यावरणविषयक व आर्थिक महत्त्व लोकांना माहीतच नाही. या भागात बांबू मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बांबू हे जंगली पीकच राहिले आहे. त्यामुळे उच्च प्रतीचा बांबू मिळत नाही, हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. अनेक ठिकाणी तर बांबू तोडून रबर झाडाची लागवड करण्यात आलेली आहे. या भागात जंगल मोठे आहे. मात्र, त्यात झाडे नाहीत. अशा परिस्थितीत बांबूची शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे महत्वाचे झाले असून, शालेय अभ्यासक्रमातच बांबू शेती, त्याचे महत्व विशद करून प्रशिक्षण देणे गरजेचे झाले आहे,असे प्रतिपादन राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्थानचे सदस्य तथा देशभर बांबू लागवड चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी केले.
बांबू लागवडीसाठी या क्षेत्रातील प्रेमीचे संघटन वाढवून मार्केटिंगसाठी संस्थांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्थान अर्थात एन आर डीएचे ईशान्य प्रादेशिक केंद्र गुवाहाटी येथे रविवार दि. १९ रोजी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बांबू या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महत्त्वाच्या प्रतिनिधींची एकदिवशीय कार्यशाळा पार पडली, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थांनचे संचालक डॉ. गवळी, प्रा. सुरेश नागपूर, विजयकुमार, अनुराग चहलिया या व इतर अधिकाऱ्यांसह बांबू पुरवठादार अटल बोहरा, बांबूचे व्यापारी व बांबूपासून गृहउपयोगी वस्तू बनवणारे परीक्षित, बांबूच्या वस्तू परदेशात निर्यात करणारे उत्पल शर्मा, या क्षेत्रात काम करणारे राष्ट्रपती पदक विजेते महिंद्र डेका तसेच बांबूपासून टी- शर्ट आणि कपडे बनवणारे व्यवसायिक मेघाली दास, पाशा पटेल यांचे सहकारी संजय करपे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी गवळी यांनी पाशा पटेल यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायत राज संस्थांनमधील त्यांच्या योगदानाबद्दल प्रशंसोद्गार काढले.
अध्यक्ष भाषणात पाशा पटेल यांनी उपस्थित बांबू या क्षेत्रातील प्रतिनिधींना बांबूची शास्त्रीय लागवड, बांबूचे पर्यावरण विषयक महत्व, बांबूपासून तयार करता येणाऱ्या वस्तू, मार्केटिंग आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आसाममधील गावागावात बांबूपासून वस्तू तयार करणारे कारागीर आहेत. मात्र, प्रक्रिया केलेले बांबू त्यांना मिळत नाहीत. असे बांबू न मिळाल्यास वाहतूक खर्च आणि टोल नाक्यातच त्यांची किंमत संपून जाण्याची भीती हे कारागीर व्यक्त करू लागले आहेत. तुम्ही आमचे नेतृत्व करा, असे ते वारंवार सांगत आहेत. आपणास वाटायचे की, आसाम बांबू या क्षेत्रात पूर्ण देशाचे नेतृत्व करेल. मात्र, इथे आल्यानंतर लक्षात आले की, आपण बांबूचा जो अभ्यास केला, तो येथील लोकांना माहीतच नाही. महाराष्ट्रात जशी बांबू चळवळ उभारतोय, तसेच आसाम, नागालँड आदी ईशान्य भागातील सात राज्यात उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आसामपेक्षा जास्त बांबू आहे. मात्र, ते जंगली असून, ते काढून शास्त्रीय पद्धतीने लागवड करणे काळाची गरज बनली आहे. ते आव्हान येथील जनतेने स्वीकारले नाही म्हणून बांबूप्रेमी लोकांचे संघटन वाढविण्याचे काम आपण राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थांनच्या माध्यमातून करणार असल्याचे पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
![](http://godateer.com/wp-content/uploads/2021/12/png-transparent-logo-whatsapp-watercolor-splash.png)