Saturday, July 27, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेडमध्ये: शिवसेनेकडून बाबुराव कदम हिंगोलीतून, तर राजश्री पाटील यवतमाळमधून आज अर्ज दाखल करणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार हिंगोली आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज नांदेडमध्ये आगमन होत असून ते नांदेड येथून हिंगोली आणि यवतमाळकडे प्रयाण करणार आहेत. हिंगोली येथे त्यांचे शिवसेना उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर आणि यवतमाळ येथे राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते खास उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानामध्ये नांदेड विमानतळावर सकाळी साडेदहा वाजता येणार असून येथून मुख्यमंत्री हेलिकॉप्टरद्वारे हिंगोली आणि त्यानंतर यवतमाळ येथे फॉर्म भरण्यासाठी रवाना होणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये आठ उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. हिंगोली लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोलीची उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे २६ एप्रिल रोजी हिंगोली मतदारसंघाचे मतदान पार पडणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज दि. ४ एप्रिल ही शेवटची मुदत आहे. त्याचबरोबर यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी या पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

राजश्री पाटील यांचे माहेर यवतमाळ
राजश्री पाटील यांचे मूळ माहेर यवतमाळ आहे. राजश्री पाटील या सामजिक तसेच सहकार क्षेत्रात अग्रेसर आहेत. खा. हेमंत पाटील यांच्या जागी बाबुराव कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे खा. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देऊन हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहेत.

खा. भावना गवळी या गेल्या काही दिवसांपासून लोकसभेची उमेदवारी पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत होत्या. त्यांनी मध्यंतरी खा. हेमंत पाटील आणि खा. हेमंत गोडसे यांच्यासह वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. दोन दिवसांपूर्वी भावना गवळी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनाही भेटल्या होत्या. त्यानंतर काल बुधवारी सकाळपासून भावना गवळी या वर्षा बंगल्यावर ठाण मांडून बसल्या होत्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांच्याऐवजी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगण्यात येते.

थेट एबी फॉर्म भरणार
बुधवारी शिंदे गटातून हिंगोलीसाठी बाबुराव कदम कोहळीकर आणि यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांची नावे चर्चेत आली आहेत. खा. हेमंत पाटील यांना हिंगोलीतून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मंगळवारी रात्री वर्षा बंगल्याच्या परिसरात मोठा ड्रामा झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिंदे गटाने बाबुराव कदम कोहळीकर हिंगोलीतून तर राजश्री पाटील यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून लढतील, असे निश्चित केल्याचे सांगण्यात येते. शिंदे गटाकडून या उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार नाहीत. हे दोघेही आज थेट निवडणुकीचा एबी फॉर्म भरतील, असे सांगितले जात आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!